नवी दिल्ली : वृत्तसंस्था
T20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानवर तब्बल 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर-8 मध्ये प्रवेश केला. कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात भारताचा खेळ प्रभावी ठरला, तर पाकिस्तानचा शरणागती पत्करणारा अंदाज अनेकांना आश्चर्यचकित करणारा ठरला.या विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व विभागांत उत्कृष्ट कामगिरी केली. चाहत्यांना पुन्हा एकदा विश्वविजेतेपद पटकावण्याची आशा बळावली आहे.

पण या विजयामागे एक विचित्र योगायोगही आहे. कारण सामना 15 फेब्रुवारी, महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. आणि ही पहिली वेळ नाही की या दिवशी भारत–पाकिस्तान सामना जिंकलं. 2003 आणि 2015 च्या वर्ल्ड कपमध्येही 15 फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानला हरवले होते.2003 मध्ये पाकिस्तानवर विजय मिळाल्यानंतर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली, पण ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. 2015 मध्येही उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आणि ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. आता 2026 मध्ये पुन्हा महाशिवरात्र, पुन्हा पाकिस्तानवर विजय, हा योगायोग पाहता “इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?” असा प्रश्न अनेक चाहते आणि विश्लेषकांच्या मनात आहे.
तज्ज्ञांचे मत वेगळे आहे. सध्याचा भारतीय संघ अधिक संतुलित दिसत आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये टीम इंडिया सक्षम असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आत्मविश्वास स्पष्ट दिसतो.आता प्रश्न फक्त एवढाच आहे की, 2003 आणि 2015 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का किंवा टीम इंडिया यावेळी इतिहास बदलून नवा अध्याय लिहिणार? या उत्तरासाठी भारताला अजून काही महत्त्वाचे सामन्यांना सामोरे जावे लागणार आहे.


