मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकार राज्यात नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. या संहितेनुसार आठवड्यात ४८ तास काम करण्याची अट कायम ठेवून कामाचे वेळापत्रक लवचिक करण्याचा प्रस्ताव आहे. कामगारांना तीन ते चार दिवसांत ४८ तास काम पूर्ण करून उर्वरित दिवस भरपगारी सुट्टी घेता येणार आहे. कामाचे तास कामगार आणि मालक यांच्या संमतीने ठरवले जाणार आहेत.

वेतन संहितेत सुधारणा करताना ठरलेले वेतन न दिल्यास संबंधित मालकावर ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महिलांना रात्रपाळीत काम करण्याची परवानगी देण्यात येणार असून, त्यांच्या कामाच्या ठिकाणी पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थ उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये अतिरिक्त वेळ काम करणाऱ्या कामगारांना दुप्पट बोनस देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. धोकादायक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना विमा संरक्षण देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कामगार संहितेशी सुसंगत सुधारणा करून राज्यात स्वतंत्र कायदा लागू केला जाणार आहे. यासाठी पुढील ४० दिवसांत हरकती व सूचना मागवण्यात येणार असून, त्यानंतर विधिमंडळाच्या मंजुरीनंतर ही संहिता लागू केली जाईल.


