Home » महाराष्ट्र » महायुती सरकारमधील चार मंत्र्यांना डच्चू देणार ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा !

महायुती सरकारमधील चार मंत्र्यांना डच्चू देणार ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा !

मुंबई : वृत्तसंस्था

महायुती सरकारचे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळताना दिसत असलेला व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राज्य मंत्रिमंडळावर थेट निशाणा साधत मोठा दावा केला आहे. अमित शहा यांनी महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे ठरवले असून, त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचेही नाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांनी महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवले आहे. त्यात माणिकराव कोकाटे यांचे देखील नाव आहे. अमित शाह यांनी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनाही त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात केलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही नावे आहेत, त्यात संबंधित कृषीमंत्र्यांचे नाव असल्याची माझी पक्की माहिती असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

या प्रकरणावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवही जोरदार टीका करत दुटप्पी आणि ढोंगी म्हटले आहे. छत्तीसगडमधील अनेक राजकीय नेत्यांवर ऑनलाइन गेमिंग संदर्भात कारवाई झाली. भूपेश बघेल माजी काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत, चिरंजीवांना देखील ईडीने अटक केली. पण अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातले राजकारणी आणि सत्ताधारी करत आहेत. त्यांचा ऑनलाईन गेमिंगच्या पैशांमध्ये मोठा सहभाग आहे, असा आरोप करत त्यांच्यावर छत्तीसगड, झारखंड, किंवा दिल्लीतल्या अनेक उद्योगपती आणि राजकारणांवर केलेल्या कारवायांप्रमाणे ईडीने किंवा सीबीआयने कुठलीही कारवाई केली नाही. हा दुटप्पीपणाच आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ मुलाखतीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबाबत खुले संकेत दिले. “ठाकरे बंधू एकत्रच आहेत, यावर कुणाला काही अडचण आहे का?” असे स्पष्टपणे सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “पक्षप्रमुख उद्धवजींनी जर हे स्पष्ट संकेत दिले असतील, तर माझा देखील तोच प्रश्न आहे. कोणाला काही पोटदुखी आहे का? राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरच्या सभेत सकारात्मक संकेत दिले. उद्धवजींनी मुलाखतीत स्पष्ट मत मांडले. आता यावर फार चर्चा न करता भविष्यात ज्या काही घडामोडी घडणार आहेत, त्याकडे लक्ष ठेवावे, असे त्यांनी म्हटले.

आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका हॉटेलमध्ये दिसले? त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, दोन्ही नेते एका हॉटेलमध्ये होते. परंतु हे दोन्ही नेते भेटले की नाही ते तेच सांगू शकतात. परंतु यामुळे शिंदेंच्या पोटात भितीचा गोळा निर्माण झाला आहे, असे राऊत यांनी म्हटले.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *