नागपूर : वृत्तसंस्था
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या मुलांच्या इथेनॉल कारखान्यांवरून होत असलेल्या आरोपांवर सडेतोड उत्तर दिले आहे. कितीही आरोप झाले तरी आपण विचलित होणार नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

या आरोपांमागे असलेल्या लोकांबद्दल बोलताना, गडकरींनी स्पष्ट केले की, ज्यांचा व्यवसाय त्यांच्यामुळे अडचणीत आला आहे, अशा लोकांनीच आपल्याविरुद्ध ‘पेड न्यूज’ सुरू केली आहे. राजकारण हे कसे चालते, याबद्दल भाष्य करताना ते म्हणाले की, “राजकारण हा ईर्ष्या, मत्सर, द्वेष आणि अहंकाराचा खेळ आहे”.
गडकरींनी आपली राजकीय प्रतिमा स्वच्छ असल्याचा पुनरूच्चार केला. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून एक रुपयाही घेतला नाही. तसेच, खराब काम करणाऱ्या कंत्राटदारांची आपण कठोर चौकशी करतो त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आपल्याला घाबरतात. परिणामी, लोकांचाही आपल्या कामावर विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. आपण कोणत्याही प्रकारची खोटी कामे केलेली नाहीत.
येणाऱ्या काळात कोणी कितीही खोटे आरोप केले तरी आपण विचलित होणार नाही आणि लोकांनीही विचलित होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. जनतेला सत्य माहित असते.
टीका-टिप्पणी करणाऱ्यांच्या मानसिकतेवर बोट ठेवत ते म्हणाले, “आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल” या आशेपोटी लोक अशा प्रकारच्या टीका टिप्पणी करतात. माझ्यावर खोट्या बातम्या लावून आरोप केले जातात.
मी अनेक वेळा या संकटातून गेलो आहे, पण जनता कधीही या खोट्या आरोपांवर विश्वास ठेवत नाही. राजकारण हे ईर्षा, मत्सर आणि द्वेष यातून केले जाते, असे गडकरींनी या संदर्भात बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले की, आपल्याला कितीही खोटे आरोप केले तरी आपण विचलित होत नाही.



