बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनैतिक संबंधांचे कारण दाखवण्यासाठी तयार केलेल्या कळंब येथील एका महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. ही हत्या 7-8 दिवसांपूर्वी झाली असून, ती आता उघड झाली. दमानिया म्हणाल्या, “गुंड आणि हत्या थांबतच नाहीत. ही महिला देशमुखांवर खोटे आरोप लावण्यासाठी तयार होती.” कळंबच्या द्वारका नगरात राहणाऱ्या या महिलेच्या घरातून दोन दिवस उग्र वास येत होता. बीड आणि स्थानिक पोलिसांनी दरवाजा तोडला असता, सडलेला मृतदेह आढळला. जागेवरच शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार उरकले गेले.

ही महिला विविध नावांनी पुरुषांना फसवत होती, असा दावा दमानिया यांनी केला. 9 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी तिला अवैध संबंधांचे कारण दाखवण्यासाठी पुढे आणले होते. रुग्णवाहिका कळंबकडे नेत असताना गावकऱ्यांनी पाठलाग करत हा डाव उधळला. या हत्येमागे देशमुख प्रकरणातील धागेदोरे लपवण्याचा प्रयत्न की अन्य कारण, याचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली असून, पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.



