बीड : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील मसाजोग गावच्या दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दीड वर्षे पूर्ण होत असून प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा आंधळे बीड जिल्ह्यात आला असल्याचा आरोप दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. या घडामोडींमुळे तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आरोपी वाल्मिक कराडने वारंवार जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि अखेरीस सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या प्रकरणात नवे वळण आले आहे. वाल्मिक कराडच्या मुलाने सुशील कराड समाजमाध्यमावर एक सूचक संदेश प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये “सर्वांसमोर सर्व काही बोलणार” असा आशय व्यक्त केला गेला आहे. यामुळे प्रकरणात नवीन खुलास्यांची शक्यता वाढल्याचे स्थानिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळांमध्ये चर्चेत येत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबतच बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचे प्रकरणही तपास पथकाच्या हाती आहे. या प्रकरणात प्राप्त नार्को चाचणी अहवाल न्यायालयासमोर सादर केला जाणार असून, हत्येच्या खऱ्या स्वरूपाबाबत महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. दोन्ही प्रकरणांचा परस्पर संबंध आहे की नाही, याबाबतही चर्चा रंगली आहे.
फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या अटकेसाठी तपास यंत्रणा हालचाली करत असल्याचे सांगितले जात आहे. वाल्मिक कराडसह आरोपींवर जामीन नाकारण्यात आल्याने पीडित कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही खटल्याचा अंतिम निकाल येईपर्यंत प्रकरण अनिश्चित आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आगामी न्यायालयीन सुनावणी, सुशील कराडच्या सूचक विधानांमुळे आणि नार्को चाचणी अहवालाच्या सादरीकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळांमध्ये उत्सुकता आणि चर्चा तीव्र झाली आहे.


