अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील वावडे येथे विहिरीचे पाणी भरण्यावरून वाद होऊन सहा जणांनी मारहाण केल्याने तरुणाचा हात मोडल्याची घटना ७ रोजी घडली.

वावडे येथील नरेंद्र भीमराव वानखेडे (वय ३०) हा ७ जून रोजी शेतात कपाशीला पाणी भरत असताना बाजूच्या शेतात काम करणारे त्याचे काका शिवाजी विठ्ठल पाटील यांनी मोटरचा फ्यूज काढून घेतला. नरेंद्र याने याबाबत विचारणा केली. त्याचा राग आल्याने दोघात बाचाबाची झाली. त्यामुळे बाजूच्या शेतात काम करणाऱ्या नरेंद्र वानखेडे यांच्या काकू सुलाबाई शिवाजी पाटील, काका गुलाब विठ्ठल पाटील, चुलत भाऊ ज्ञानेश्वर गुलाब पाटील यांची पत्नी आशाबाई ज्ञानेश्वर पाटील, पुतण्या प्रतीक ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने व लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी येऊन नरेंद्र याची सुटका केली. या मारहाणीत त्याला गंभीर इजा झाली असून त्याचा उजवा हात फॅक्चर झाला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याने या सर्व सहा जणांविरुद्ध मारवड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा तपास हे. कॉ. दिनेश पाटील करत आहेत.



