जळगाव – महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गंभीर आर्थिक अनियमितता आणि कथित घोटाळ्याप्रकरणी अखेर आयुक्त आदित्य जीवने यांनी निर्णायक पावले उचलली आहेत. विभागातील गैरव्यवहार आणि मनपाला झालेल्या आर्थिक नुकसानीची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांनी ५ सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे.
या समितीला सर्व दस्तऐवज ताब्यात घेऊन तातडीने मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.विशेष म्हणजे, चौकशीत बी.व्ही.जी. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कचऱ्याचे वजन, आयसीटी प्रणाली आणि संशयास्पद बिलांचे विशेष लेखापरीक्षण होणार आहे. उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी मागील तीन महिन्यांपासून या गैरप्रकारांबाबत सातत्याने आवाज उठवला होता.

अशी आहे चौकशी समिती
अखेर त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी ९ जुलै रोजी अधिकृत आदेश जारी केले.चौकशी समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त अध्यक्ष, उपायुक्त (महसूल) सदस्य सचिव, मुख्य लेखापरीक्षक, सहा. आयुक्त (आस्थापना) आणि कनिष्ठ अभियंता योगेश वाणी यांचा समावेश आहे. दोषी अधिकारी, कर्मचारी किंवा ठेकेदार आढळल्यास कठोर कारवाईसह मनपाला झालेल्या आर्थिक नुकसानीची संपूर्ण वसुली केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


