Home » राज्य » शेतीचा वाद पेटला अन भावाने काकूसह भावाला संपवून घेतला टोकाचा निर्णय !

शेतीचा वाद पेटला अन भावाने काकूसह भावाला संपवून घेतला टोकाचा निर्णय !

वर्धा : वृत्तसंस्था

राज्यातील वर्धा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. निमसडा गावात शेतीच्या धुऱ्याच्या वाटपावरून उद्भवलेल्या वादाने जीवघेणे वळण घेतले. एका चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वतः विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मृतांमध्ये साधना सुभाष मोहिजे (वय 55) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय 27) यांचा समावेश आहे. ही हत्या त्यांचा पुतण्या महेंद्र मोहिजे याने केली. पोलीस तपासानुसार, महेंद्र आणि नितीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या वाटप आणि ठेक्याने शेती देण्याच्या मुद्द्यावरून तणाव होता.

शुक्रवारी सकाळी हा वाद टोकाला गेला. संतप्त महेंद्रने कुऱ्हाडीने साधना आणि नितीन यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली.

अल्लीपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनीही भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस सध्या शेजारी आणि नातेवाइकांचे जबाब नोंदवत तपास करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *