भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील दीनदयाल नगर परिसरात झालेल्या जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याने बाजारपेठ पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना दि. १ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पहिल्या तक्रारीनुसार, समीर शाह शब्बीर शाह (वय २८, रा. दीनदयाल नगर) हे १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कामावरून घरी जात असताना कलीम शेख सलीम, तस्लिम शेख सलीम, समीर शाह जब्बार शाह ऊर्फ डमरू व केवल टाक यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. कलीम शेख याने कुन्हाडाच्या दांड्याने डोक्यावर वार केल्याने समीर शाह जखमी झाले. याचवेळी तस्लिम शेख याने त्यांच्या खिशातील ३ हजार रुपये हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. भांडण सोडवण्यासाठी आई हसिना बी आल्या असता आरोपींकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेनंतर कलीम शेख सलीम यांनीही वेगळी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री ११ वाजेच्या सुमारास अमीर शाह शब्बीर शाह यांच्याशी वाद झाला. त्यानंतर काही वेळात अमीर शाह शब्बीर शाह, कालू शाह बशीर शाह, कालू शाह शब्बीर शाह, हसिना बी शेख शब्बीर आणि जाविद शाह सुलेमान शाह यांनी शिवीगाळ करून तलवार व लोखंडी रॉडने हल्ला केला. या मारहाणीत कलीम शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच तक्रार देण्यासाठी जात असताना त्यांच्या आई ताहेरा बी यांनाही काठीने मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप आहे.



