मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे गटाची युती होण्याचे संकेत असतांना आता ठाकरे गटाला धक्का देणारी एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. राजकारणात वादग्रस्त आणि भडक विधानांसाठी ओळखले जाणारे भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य करून चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहेत. तुळजापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “पावसाळ्यात आदित्य ठाकरे तुरुंगात जाऊ शकतात,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यांनी या विधानातून डिनो मोरिया प्रकरणाशी जोडलेले गंभीर आरोप केले आहेत.

नितेश राणे म्हणाले, “डिनो मोरिया प्रकरणात काय कारवाई होतेय, हे पाहायला हवं. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा अर्थातच आदित्य ठाकरे याची अडचण वाढू शकते. त्यामुळे पावसाळ्यात ते जेलमध्ये जातील, अशी शक्यता आहे.” राणेंच्या मते, डिनो मोरिया कोणासोबत उठबस करत होता, कोणासोबत त्याचे भावनिक संबंध होते, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यामुळेच या प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी उद्धव-राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा जाणीवपूर्वक पुढे आणल्या जात आहेत, असा दावा त्यांनी केला.



