नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सर्व निमलष्करी दलांच्या प्रमुखांना रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचे निर्देश दिले. शाह जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सतत संपर्कात आहेत. सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची खात्री करण्यासही त्यांनी सांगितले.

आपत्कालीन परिस्थितीत नागरी लोकसंख्येला आश्रय देण्यासाठी बंकर तयार ठेवण्यासही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे, असे सूत्रांनी सांगितले. ते म्हणाले की, गृहमंत्र्यांनी सर्व केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या प्रमुखांना रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचे निर्देश दिले आहेत. शहा यांनी देशातील अंतर्गत सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास आणि कडक नजर ठेवण्यास सांगितले.
गृहमंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे पहलगाममधील निष्पाप लोकांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेला प्रतिसाद असल्याचे वर्णन केले. त्यांनी असेही म्हटले की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारत आणि त्याच्या लोकांवरील कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि भारत दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ही कारवाई केली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला.
भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर काही तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (७ मे) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सूत्रांनी सांगितले की ते सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती (CSC) च्या बैठकीचे अध्यक्षस्थान देखील घेतील, ज्यामध्ये सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. सूत्रांनी सांगितले की, संरक्षण दलांकडून रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या कारवाईचा प्रस्तावही बैठकीत मंजूर केला जाऊ शकतो. भारतीय सशस्त्र दलांनी मंगळवारी आणि बुधवारी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचा अड्डा यांचा समावेश आहे.



