कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आज आंदोलन होणार होते पण त्यापूर्वीच सांगली पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेतले आहे. सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची देखील पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच पोलिस राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी दाखल झाले. अन् त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तर शेतकरी संघटनेच्या इतर काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून राजू शेट्टी यांनी आज आंदोलनाचा इशारा दिला होता. राजू शेट्टी यांनी आज रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला मोठ्यासंख्येने शेतकरी सहभागी होणार होते. नागपूर-रत्नागिरी महामार्ग मधील कोल्हापूर जिल्ह्यातील 800 एकर जमीन भूसंपादनामधील 740 एकर भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली आहे. तर एकरी जमिनीसाठी चौपट मोबदला मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. चौपट मोबदला मिळवण्यासाठी गेला काही दिवसांपासून शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी शेतकऱ्यांची तब्येत खालावल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.
राजू शेट्टी म्हणाले की, या महामार्गाचा देवाधर्माच्या नावाने घाट घातला आहे. मात्र आपला फायदा कसा करून घ्यायचा यासाठी हा महामार्ग केला जात आहे. पवनारपासून सुरू होणारा रस्ता पत्रादेवीला जाणार आहे. तेथून तो पुढे गोव्याला कशासाठी जाणार हे मला माहीत नाही, याचाच अर्थ हा मार्ग देवाच्या आळंदीचा नव्हे, तर चोराच्या आळंदीला जाणारा आहे. सांगली व कोल्हापूर जिल्हा या शक्तीपीठ महामार्गामुळे महापूराच्या भीषण परिस्थितीत सापडणार आहे. औद्योगीक क्षेत्रासह लाखो एकर शेतजमीन व हजारो कुटूंबे यामुळे उध्वस्त होणार आहेत. औदुंबर ते आदमापूर या 72 किलोमीटर मध्ये जवळपास 20 ते 24 किलोमीटर भरावाचा पूल होणार आहे. याबाबत कोणत्याच उपाययोजना रस्ते विकास महामंडळ व राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नाहीत. राज्य सरकार जनतेला व सर्वसामान्य जनतेला अंधारात ठेवून एवढ्या गोष्टी का करत आहे हा संशोधनाचा विषय आहे.



