सातारा : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक केली आहे. 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी घेतले ताब्यात. सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची मागणी करत 1 कोटी स्वीकारत असताना कारवाई करण्यात आली.

दरम्यान रोहित पवार म्हणाले की, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केलेल्या महिलेने करार केला होता की त्या महिलेला कुणी त्रास देणार नाही, त्या करारामुळे ते कोर्टातून सुटले. पण तो करार करण्याची गरज काय असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे. हायकोर्टमधील महिला न्यायाधीश होत्या त्यांनी त्या प्रकरणी ताशेरे का ओढले? या सर्व गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. पण त्या महिलेला जी अटक केली आहे, त्याचा अभ्यास केला पाहिजे.
जयकुमार गोरे यांच्या प्रकरणी खरात नावाच्या पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना जेलमध्ये टाकत आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. त्या महिलेबद्दल जी माहिती येत आहे, त्याबद्दल मला माहिती नाही. 1 कोटी खंडणी प्रकरणी त्या महिलेला अटक केली हे आपण थोड्यावेळ खरं माणू पण तिला 1 कोटी रुपये दिले का? त्या महिलेकडे असे काय होते की तिला 1 कोटी रुपये देण्याची वेळी आली, असा सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, जयकुमार गोरे यांच्याकडे 1 कोटी रुपये आले कुठून हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही जर धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात तर तुमच्याकडे पैसे मागत असेल तर काहीच परवा नसेल तर दुर्लक्ष करत पोलिसांत जाता आले असते. पण तुम्ही पैसे पाठवले.



