मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कायद्यानुसार गो हत्या करणे गुन्हा आहे. मात्र गो हत्येचा वारंवार गुन्हा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) यापुढे कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

श्रीगोंदा येथील कायदा-सुव्यवस्थेबाबत अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी बोलताना फडणवीस यांनी ही घोषणा केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे २ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन समाजांमध्ये वाद झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मारहाणीत जखमींना त्यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई केल्याचे दिसून येत नसल्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
फटाके वाजवण्यावरुन मातंग समाजातील ससाणे आणि इतर अकरा लोकांना मारहाण झाली. त्यानंतर ससाणे यांच्या मृत्यू झाला. सव्वा महिन्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, याबाबत संग्राम जगताप सभागृहात बोलत होते. येथे आणि संपूर्ण जिल्ह्यात गोतस्करी, गोहत्या यासह अनेक व्यवसाय असलेल्या कुरेशी गँगची दहशत आहे. कुरेशीवर 18 ते 20 गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणी स्थानिक पोलीस निरीक्षक यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच गोहत्या, गोतस्करी विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी संग्राम जगताप यांनी केली.
तत्पूर्वी, या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे २ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन समाजामध्ये वाद झाला. या वादाचे नंतर मारहाणीत रूपांतर झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच मारहाणीत जखमींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या एका इसमाचा यात मृत्यू झाला. पोलिसांनी यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई केल्याचे दिसून येत नाही.



