जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील गाढोदा गावातील गिरणा नदीपात्रात घट विसर्जनाच्या दरम्यान तीन मुले बुडाल्याची घटना दि. २ ऑक्टोबर रोजी घडली. त्यात गणेश उर्फ बाबा भोलेनाथ पाटील (वय १६) या मुलाचा मृत्यू झाला. घट विसर्जनाच्या दरम्यान गणेश आणि त्याचे काही मित्र नदीपात्रात पोहायला उतरले. अर्ध्या तासापर्यंत ते पाण्यात खेळत होते. मात्र, अचानक नदीच्या मुख्य धारेत गणेशसह त्याचे दोन मित्र वाहू लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील तुकाराम अरुण पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी मारली. त्यांनी अन्य दोन मित्रांना तत्काळ वाचविण्यात यश मिळविले. काही वेळाने गणेशला नदीतून बाहेर काढत खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची सर्वात दुःखद बाजू म्हणजे, मृत गणेशचे वडील भोलेनाथ पाटील हे घटनेच्या वेळी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरील त्यांच्या शेतात काम करत होते. या घटनेमुळे त्यांना मोठा धक्का बसला. नववीत शिकणाऱ्या गणेशला एक मोठी बहीण आहे.



