पुणे : वृत्तसंस्था
भोसरी एमआयडीसीतील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. खडसे दाम्पत्य सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने हे कठोर आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

एकनाथ खडसे व मंदाकिनी खडसे यांच्यावर भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहारात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी व सुनावणी गेल्या अनेक वर्षांपासून सत्र न्यायालयात सुरू आहे. शुक्रवारी या प्रकरणात आरोप निश्चिती होणार होती. मात्र खडसे दाम्पत्य न्यायालयात गैरहजर राहिल्याने न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, या प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांच्याविरोधात मनी लॉन्डरिंगप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे एक हजार पानांच्या या आरोपपत्रात खडसे कुटुंबीयांसह तीन खासगी कंपन्यांचाही समावेश असून, भोसरीतील जमीन व्यवहारात काळ्या पैशांचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घडामोडींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. “कुकर्माची फळे याच जन्मात भोगावी लागतात,” असे सांगत त्यांनी २०१६ साली खडसेंनी आपल्याविरोधात विविध जिल्ह्यांत दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यांचा संदर्भ दिला. त्या काळात तारीख चुकल्यामुळे आपल्यावर अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आल्याचा अनुभव त्यांनी नमूद केला असून, तो मानसिक छळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


