जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव तालुक्यात १६ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्शवभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी या दोन्ही तालुक्यांमध्ये तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी निकषांपेक्षा तीनपट अधिक मदत देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार पाटील यांनी दोन्ही तालुक्यांची पाहणी केल्यानंतर ही मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे या भागातील खरीप हंगाम पूर्णतः नष्ट झाला असून, शेतात चिखलाचे साम्राज्य असल्याने पीक काढणी शक्य नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
पाटील यांच्या म्हणण्यानुसार, पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. शेतजमिनीतील पाण्याचा निचरा होत नसल्याने जमिनीत पाणी साचले आहे. सलग दुसऱ्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
पाचोरा येथे झालेल्या पावसाची आकडेवारी
१६ सप्टेंबर – ११४.८ मिमी
२२ सप्टेंबर – १४७.८ मिमी
२३ सप्टेंबर – १३९.३ मिमी
२३ सप्टेंबरपर्यंत पाचोरा तालुक्यात सरासरी पावसापेक्षा १८९ टक्के अधिक म्हणजे २५७.८ मिमी पाऊस झाला आहे. तर भडगाव तालुक्यात २३ सप्टेंबर पर्यंत सरासरीच्या ९०.७० मिमी च्या तुलनेत १७९ टक्के पाऊस झाला आहे.
