अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाच्या हाहाकारामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले असून, पंचनाम्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवाळीच्या आत नुकसानभरपाई खात्यावर जमा करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे, असा आधार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.

पारनेर येथे राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विजय औटी यांच्या संकल्पनेतून तालुका महाविकास आघाडीतर्फे आयोजित दसरा रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खा. डॉ. सुजय विखे, आ. संग्राम जगताप, आ. काशिनाथ दाते आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, महायुती सरकार पाण्याच्या सिंचन प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून, दोन दिवसांत काही मंत्र्यांसोबत तातडीने बैठक घेऊन अतिवृष्टीसंबंधात निर्णय घेतला जाईल. ज्या जिल्ह्यात नुकसान झाले तेथील शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. तालुक्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करणार असून, येथील पाणीप्रश्न, तसेच शहर विकास आराखडा मंजूर करणार असल्याची ग्वाही या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
तालुक्यात कोणाची हुकूमशाही चालू देणार नाही. मतांची चोरी झाली, असं विरोधक खोटं पण रेटून सांगतात. परंतु लोकसभेला आमचा पराभव झाला. आमच्या कमी जागा आल्या, तरीही आम्ही म्हटले नाही की मतांची चोरी झाली.
पराभव मान्य करून पुन्हा जनतेपर्यंत गेलो. लाडक्या बहिणीसारखी योजना आणली. विधानसभेला महायुतीचे अनेक उमेदवार निवडून आले, असे मंत्री पवार यांनी म्हटले. मेळाव्यात सुपा औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी २०० तरुणांना जॉबकार्ड देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, कपिल पवार, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, मतदारसंघ अध्यक्ष विजय औटी, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजप मंडलाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, विक्रम कळमकर, सचिन पाटील वराळ, दत्ता पानसरे, बाळासाहेब नाहटा, सुधामती कवाद, अश्विनी थोरात, दत्तात्रय रोकडे, सोनाबाई चौधरी, सागर मैड, वसंत चेडे, अशोक चेडे, दत्ता नाना पवार, कविता औटी, नंदू औटी, भाऊसाहेब खिलारी, सुभाष दुधाडे आदी उपस्थित होते.



