जयपूर : वृत्तसंस्था
देशातील राजस्थानमधील टोंक येथून मंगळवारी येथे एक दुःखद घटना घडली. जयपूरमधील ११ तरुण बनास नदीत स्नानासाठी गेले होते आणि जोरदार प्रवाहात ते सर्व जण वाहून गेले. सर्व तरुण दुपारी १२ वाजताच्या सुमारास पिकनिकसाठी नदीच्या जुन्या पुलाजवळ पोहोचले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. यामध्ये आठ जणांना जलसमाधी मिळाली असून तीन जणांचा शोध सुरू आहे.

स्थानिक लोकांच्या मते, सर्व तरुण एकत्र नदीत आंघोळ करण्यासाठी उतरले, परंतु काही वेळाने जोरदार प्रवाहामुळे एक-एक करून खोलवर गेले आणि बुडू लागले. स्थानिक ग्रामस्थांनी धोक्याची घंटा वाजवली आणि ताबडतोब पोलिसांना कळवले. माहिती मिळताच टोंक पोलिस, प्रशासन आणि एसडीआरएफ पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले.
आतापर्यंत ८ तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर उर्वरित ३ जणांचा शोध सुरू आहे. सर्वांना सआदत रुग्णालयात आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी आठही तरुणांना मृत घोषित केले. स्थानिक लोकांनी सांगितले की, नदीचा हा भाग खोल आहे आणि येथे कोणताही इशारा फलक किंवा सुरक्षा व्यवस्था नाही. हा जुना पूल परिसर आहे. तिथे लोक अनेकदा माहितीशिवाय आंघोळीसाठी जातात. घटनेची माहिती मिळताच, सआदत रुग्णालयात नातेवाईक आणि स्थानिक लोकांची गर्दी जमली. आरडाओरड आणि शोकाकुल वातावरणात मृतांची ओळख पटवली गेली. सर्व तरुण जयपूरचे रहिवासी होते. पोलिसांनी सांगितले की, अतिरिक्त गोताखोरांना बोलावण्यात आले आहे. या अपघातानंतर संपूर्ण टोंक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि तपास आणि मदतकार्य तीव्र केले आहे.



