मुंबई : वृत्तसंस्था
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची २१ ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. यासंदर्भात भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जेपी नड्डा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.

यानंतर राज्यपाल सीपी राधाकृष्णन सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार यांनी त्यांची विमानतळावर भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील माणसाला सर्वांनी समर्थन द्यावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या खासदारांना केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून एनडीएने घोषित केले आहे आणि ही आपल्या सगळ्याकरता आनंदाची गोष्ट आहे. सीपी राधाकृष्णन हे जरी मुळचे तामिळनाडूचे असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आहेत. तसेच महाराष्ट्राचे मतदार देखील आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात मतदान केले आहे. मतदार यादीत त्यांचे नाव महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आहे. ते उपराष्ट्रपतीपदाचा जो फॉर्म भरणार आहेत, त्या फॉर्ममध्ये त्यांना ते कुठले मतदार आहेत, याचा पुरावा जोडावा लागतो. त्यामुळे ते महाराष्ट्राचे मतदार म्हणून त्याठिकाणी पुरावा लावणार आहेत. म्हणून महाराष्ट्राकरता ही विशेष आनंदाची गोष्ट आहे. असे फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रातला माणूस उपराष्ट्रपती होतो आहे, त्यामुळे माझी अपेक्षा की, महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी त्यांना मतदान केले पाहिजे. महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे जे पक्ष आहेत, मग शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, या पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी सीपी राधाकृष्णन यांना समर्थन दिले पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातला एक मतदार हा उपराष्ट्रपती होतो आहे, त्याकरता सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.



