मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत. त्याचा मला आनंद आहे. पण ते टोमणे मारण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत, असे ते म्हणालेत.

उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्त्वातील महायुती सरकावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काढून घेण्यासाठी कर्जमाफीसाठी पुढील वर्षी जून महिन्याची तारीख दिली आहे, असे ते म्हणालेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडले आहेत. त्याचा मला आनंद आहे. ते टोमणे मारण्यापलिकडे काहीच करू शकत नाहीत. तुम्ही मला त्यांनी विकासावर केलेले भाषण दाखवा आणि हजार मिळवा, असे ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कालच्या पत्रकार परिषदेवर टीका केली होती. आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली असे ते म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या टीकेचाही समाचार घेतला. राज ठाकरे यांना एकच उत्तर पाहिजे. ते म्हणजे निवडणुका पुढे ढकली. त्यांना दुसरे कोणतेही उत्तर अपक्षेति नाही. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत. त्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीचाच विजय होण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही त्या निवडणुकांना सामोरे जाऊ. आमचे तिन्ही पक्ष आपापल्या पातळीवर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकच आहोत. एखाद्या ठिकाणी युती झाली नाही, तर त्या ठिकाणी निवडणुकीनंतर युती होईल. त्यामुळे या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल.
उल्लेखनीय बाब म्हणजे विरोधी पक्षांनी गत दोन-तीन महिन्यांपासून मतचोरी व मतदारयाद्या स्वच्छ केल्यानंतरच निवडणउका घेण्याचा धोशा लावला आहे. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याविषयी सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. पण त्यानंतरही राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकांची घोषणा केली. यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे.



