नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात होणाऱ्या अवैध व्यवहारांवर सरकारने अधिक कठोर पद्धतीने अंकुश लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, शैक्षणिक संस्थांच्या आसपास पान, तंबाखू तसेच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत थेट कारवाई केली जाणार आहे. यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्यात येत असून, गुन्हेगारांवर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रक्रिया वेगात सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी महापालिका आणि नगरपालिकांना अशा दुकानांवर आणि पानटपऱ्यांवर कारवाई करून त्या उद्ध्वस्त करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. या संदर्भातील मुख्य प्रश्न प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला होता, तर अभिमन्यू पवार आणि अस्लम शेख यांनी संबंधित उपप्रश्न विचारले.
दरम्यान, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या गैरव्यवहारांवरही राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. मंत्री अतुल सावे यांनी माहिती देताना सांगितले की, बोगस प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि याबाबतची तीन महिन्यांत सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. बापू पठारे यांनी या विषयावर प्रश्न विचारला होता. तर बबनराव लोणीकर आणि सुनील प्रभू यांनी महत्त्वाचे उपप्रश्न उपस्थित केले.
काही जिल्ह्यांत अशाप्रकारचे प्रकार उघडकीस आले असून संबंधितांवर कारवाई सुरू असल्याचेही सावे यांनी स्पष्ट केले.



