Home » जळगाव » स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

जळगाव : प्रतिनिधी

मैत्रीचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांसोबत असणं, फक्त आनंदात नाही तर आठवणींतही. त्या भावनेला साजेसं उदाहरण ठरलं आहे जीपीएस ग्रुप मित्र परिवाराचं एक अनोखं कार्य. जीपीएस मित्र गृपचे सक्रिय सदस्य स्व. अनिल आत्माराम महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या जीपीएस गृपने एक आगळंवेगळं आणि समाजाभिमुख पाऊल उचलत पाळधी गावातील स्मशानभूमी दत्तक घेऊन तिच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अल्पशा आजाराने अनिल महाजन यांचं निधन झालं होतं. त्या काळात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त झाली आणि त्या दिवशी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी निवडणुकीचं संपूर्ण प्रचारकार्य थांबवलं होतं. आज त्या घटनेला वर्ष पूर्ण झालं असून, जीपीएस गृपने पारंपरिक कार्यक्रम, सत्कार वा सोहळा न करता समाजासाठी काहीतरी चिरंतन करण्याचा निर्धार केला. त्यातूनच पाळधीतील स्मशानभूमी दत्तक घेण्याचा आणि तिच्या स्वच्छता, रंगरंगोटी, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रकाशव्यवस्था, बसण्याची व्यवस्था आदी सुविधा निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

स्व.अनिलभाऊंनी आयुष्यभर माणसांमध्ये आपलेपणा जपला. त्यांच्या स्मृतीतून आम्ही समाजासाठी काहीतरी चांगलं घडवायचं ठरवलं आहे. स्मशानभूमीचं सुशोभीकरण म्हणजे गावाच्या संवेदनशीलतेचा भाग आहे, असं जीपीएस गृपचे प्रताप गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे पाळधी गावात आता स्मशानभूमी स्वच्छ, आकर्षक आणि सुविधायुक्त होणार आहे. जीपीएस मित्र परिवाराने उचललेलं हे पाऊल केवळ मित्राच्या आठवणींचा सन्मान नाही, तर मैत्रीच्या नात्यातून समाजसेवेचा अर्थ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे. अशा भावनिक उपक्रमांमुळे गावात संवेदनशीलतेची नवी परंपरा रुढ होत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *