Home » राष्ट्रीय » कोंबड्याच्या हत्येवरून जोरदार दगडफेक, हाणामारी !

कोंबड्याच्या हत्येवरून जोरदार दगडफेक, हाणामारी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कारणाने गुन्हेगारी घटना घडता असतांना आता उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. बलिया जिल्ह्यातल्या एका गावात एका देशी कोंबड्याच्या हत्येवरून जोरदार राडा झाला आहे. प्रकरण दगड फेकीपर्यंत पोहोचलं, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे प्रकरण जमिनीच्या वादाशी संबंधित आहे. मात्र कोंबड्याच्या हत्येमुळे वादात ठिणगी पडली आणि प्रकरण चांगलंच भडकलं. घटनास्थळी जोरदार दगडफेक आणि हाणामारी झाली.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की हा धक्कादायक प्रकार बलिया जिल्ह्यातल्या पकडी पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या गढमलपूर गावात घडला आहे. या गावच्या रहिवासी असलेल्या आरती देवी आणि त्यांच्या शेजारी राहणारे सूरज राम यांच्या कुटुंबामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू आहे. याचदरम्यान पुन्हा एकदा या दोन कुटुंबांमध्ये जोरदार भांडण झालं. जोरदार राडा झाला. हाणामारीला सुरुवात झाली. भांडण सुरू असताना सूरज राम आणि शिला देवी यांनी आरती देवी यांचा घराबाहेर असलेल्या एका कोंबड्याला दगडं मारले. या घटनेत हा कोंबडा जखमी झाला त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. कोंबड्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रकरण अधिकच पेटलं. दोन्ही कुटुंबातील सदस्य आमने-सामने आले. दगडफेक, हाणामारी आणि जोरदार राडा झाला.

या प्रकरणात आरती देवी आणि त्यांचा पती पंचमी राम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, सकाळी आठ वाजेच्या सुमारास जमिनीचा वाद उकरून काढत आमच्या शेजारी राहणारे सूरज राम आणि त्यांच्या कुटुंबाने आमच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आमच्या कोंबड्याला दगडाने मारलं. यात जखमी झालेल्या कोंबड्याचा मृत्यू झाला.आम्ही जेव्हा याबाबत त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी आम्हाला शिवीगाळ करत मारहाण केली, दगडफेक देखील केली, या घटनेत आमच्या कुटुंबातील अनेकजण जखमी झाले आहेत. त्यानंतर आरोपींना आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि ते घटनास्थळावरून फरार झाले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *