नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात अपघाताच्या मालिका सुरु असतांना आता राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात घडला. खाटू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांनी भरलेली पिकअप व्हॅन राष्ट्रीय महामार्गावर बापीजवळ उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकली. या भीषण अपघातात १० भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर डझनभराहून अधिक लोक जखमी झाले.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या ९ भाविकांना तातडीने जयपूर याठिकाणी एसएमएस रुग्णालयात रेफर करण्यात आले, तर उर्वरित जखमींवर दौसामधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जात आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुःखद घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी अधिकाऱ्यांना मदत आणि बचावकार्य लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी जखमींना चांगले उपचार देण्याबाबत आणि मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याबाबतही सांगितले. मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, “ही एक अतिशय दुःखद घटना आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो.”
माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनीही अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. दोन्ही नेत्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींच्या लवकर प्रकृतीसाठी प्रार्थना केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, पिकअप व्हॅनमधील सर्व भाविक उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील रहिवासी होते. ते खाटू श्याम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आले होते आणि दर्शनानंतर त्यांच्या गावी परतत होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात,चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा. पिकअप वेगाने जात होती. ट्रेलरशी थेट धडक झाल्यानंतर वाहनाचा चक्काचूर झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे , असे सांगण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. भाविकांचे सामान रस्त्यावर विखुरले होते आणि अनेक लोक जखमी अवस्थेत ओरडत मदत मागत होते. स्थानिक लोक आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली.



