जामनेर : प्रतिनिधी
लग्नसोहळा आटोपून माघारी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या वाहनाला भरधाव कंटेनरने धडक दिली. या अपघातात वाहन उलटून दशरथ रतन चव्हाण (वय ६५) हे जागीच ठार झाले. तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी सोनाळा फाट्याजवळ घडली. जखमींवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सोयगाव तालुक्यातील फर्दापुर तांडा येथील चव्हाण कुटुंबीय जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा (लहासर) येथून विवाह सोहळा आटोपून (एम एच ०८ आर ३५२४) क्रमांकाच्या वाहनाने घराकडे परतत होते. जामनेर पहूर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या (जी. जे. १५, ए.एक्स १४२५) क्रमांकाच्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने कुझर उलटली. या भीषण अपघातात वराचे काका दशरथ चव्हाण हे जागीच झाले तर इतर वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी वऱ्हाडातील जखमींना तात्काळ दुसऱ्या वाहनात टाकून ग्रामीण रुग्णालयात हलविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर चालकास ताब्यात घेतले असून कंटेनर पोलिसांनी जप्त केला आहे.
मोठ्या थाटामाटात लग्ग्रकार्यपार पडल्यानंतर चव्हाण कुटुंबिय आनंदाने घराकडे जात होते. मात्र वाटेतच वराच्या काकांवर दुर्देवी काळाने झडप घातली. त्यांच्या पश्चात पत्न ठारी, तीन मुले, दोन मुली, नातू असा परिवार आहे. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच जखमींमध्ये सात वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. यामुळे फर्दापुर तांडा परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातात लखिचद शंकर चव्हाण (वय ५०), मोहनदास शंकर जाधव (वय ५०) विक्रम मोतीलाल चव्हाण (वय २५), बाबू पांचु जाधव (वय ७५), उखा दलू राठोड (वय ६५), धिरलाल सदू राठोड (वय ६५), हिरा महारु चव्हाण (वय ५८), प्रतीक प्रवीण राठोड (वय ७), भिवसिग मनुर चव्हाण (वय ७५, सर्व रा. फर्दापूर तांडा) यांचा समावेश आहे.



