छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण अनेक माध्यमातून दुषित होत असताना आता मंत्री नितेश राणे यांनी मोठे विधान केले आहे.

आय लव्ह महंम्मदला उत्तर हे आता आय लव्ह महादेवच्या बॅनरने द्या. ही महादेवाची पावण भूमी आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक गल्ल्या आणि घरांमध्ये आय लव्ह महादेवचीच पोस्टर लावा, महंम्मदवाल्यांना पाकिस्तानमध्ये पाठवा, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी (दि.३) छत्रपती संभाजीनगर विमानतळावर केले. फुलंब्रीत अतिवृष्टीमुळे मत्स्य व्यवसायिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते शहरात आले होते.
यावेळी फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, सुहास शिरसाट, माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराच नव्हे तर राज्यात सध्या विविध ठिकाणी आय लव्ह महंम्मदची पोस्टर लागत आहेत. त्यावरुन जातीय तेड निर्माण होत आहे. यावर बोलतांना मंत्री राणे म्हणाले की, ही महादेवाची भूमी असून हिंदूंनी येथे आल लव्ह महादेवचीच पोस्टर लावली पाहिजेत. जो कोणी आय लव्ह महंम्मदचे पोस्टर लावत असेल त्याला पाकिस्तानला पाठवा, हवे तर मी त्याला कचराच्या विमानाची तिकीटे काढून देतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत रामदास कदम यांनी उपस्थित केलेल्या सवालावर राणे म्हणाले की, कदम यांचा बाण अतिशय योग्य दिशेने जात आहे. स्विज्झर्लंडवरुन कोण आले, हे उद्धव ठाकरे यांनी सांगावे. ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या नुकसानीवर पहिला मोर्चा मातोश्रीवर काढावा, मुख्यमंत्री असतांना त्यांनी ना चांदावर ना बांधावर काहीच दिले नसल्याचा आरोप राणे यांनी केला. संभाजीनगर दौऱ्यावर बोलांतना ते म्हणाले की, मत्स्य व्यवसाय मंत्रालयाकडून राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या ठिकाणी मत्स्य तळांचे नुकसान झाले, त्याची पाहणी करुन मदतीसाठी अहवाल तयार केला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच्या अहवालानुसार २८ कोटींचे नुकसान आतापर्यंत झाले असून फुलंब्री तालुक्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलोय, असेही ते म्हणाले.



