Home » राष्ट्रीय » मी कामासाठी मुंबईला जाईन, मराठी बोलणार नाही, मला मारलं तरी चालेल !

मी कामासाठी मुंबईला जाईन, मराठी बोलणार नाही, मला मारलं तरी चालेल !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे. जे लोक महाराष्ट्रात मराठी बोलत नव्हते, त्यांना मारहाण करण्यात आली. अशा परिस्थितीत आता अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भोजपुरी अभिनेता आणि गायक पवन सिंग यांनी मराठी-हिंदी भाषा वादावर आपलं मत मांडलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, त्यांना मराठी येत नाही आणि ते मराठी बोलणार नाहीत.

पवन सिंग म्हणाले, ‘माझा जन्म बंगालमध्ये झाला, पण मला बंगाली येत नाही. मला असंही वाटत नाही की मी बंगाली शिकू शकेन. म्हणून मी बोलत नाही. मला मराठीही येत नाही. मला हिंदी बोलण्याचा अधिकार आहे. मी महाराष्ट्रात राहतो म्हणून मला मराठी बोलायलाच हवी, हे काय आहे? ही तर उद्दामपणाची गोष्ट आहे. मी कामासाठी मुंबईला जाईन. जास्तीत जास्त लोक काय करतील, मला मारतील? मरणाची भीती मला वाटत नाही. मराठी येत नाही. मराठी बोलणार नाही, मला मारलं तरी चालेल.’

दुसरीकडे, भजन सम्राट अनूप जलोटा यांनी यावर सांगितलं की, त्यांना मराठी खूप आवडते. ते मराठीत गाणीही गातात. पण हिंदी ही देशाची मातृभाषा आहे. म्हणून सर्वत्र हिंदी बोलली पाहिजे. आपण जास्तीत जास्त भाषा शिकल्या पाहिजेत आणि बोलल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपली मातृभाषा हिंदीही बोलली पाहिजे.

पवन सिंग यांच्याबद्दल बोलायचं तर, ते भोजपुरी इंडस्ट्रीतील दिग्गज गायक आणि अभिनेते आहेत. त्यांची गाणी क्षणार्धात व्हायरल होतात. पवन सिंग यांच्या चित्रपटांनाही खूप पसंत केलं जातं. त्यांनी बॉलिवूड चित्रपट ‘स्त्री 2’ मध्येही गाणं गायलं होतं. गाण्याचे बोल होते ‘काटी रात मैने खेतों में तू आई नहीं’. या गाण्यावर श्रद्धा कपूरने नृत्य केलं होतं. हे गाणं प्रचंड हिट झालं.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *