मुंबई : वृत्तसंस्था
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. कोश्यारींनी सांगितले की, “राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्त घाबरतात.” या वक्तव्यावर मनसेकडून प्रत्युत्तर अपेक्षित होते. अखेर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना कोश्यारींच्या वक्तव्याचा कठोर शब्दांत समाचार घेतला आणि आक्रमक भूमिका मांडली.

देशपांडेंनी म्हटले, “आज जर भगतसिंह असते, तर त्या कोश्यारींना खूप चोपला असता. कोश्यारींनी आपलं नाव बदलावं.” त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेचे विधान केलेल्या कोश्यारींना प्रत्युत्तर देत मनसे शैलीत हल्लाबोल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोश्यारींच्या विधानामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
याचवेळी, देशपांडेंनी उबाठा गटातील काही नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा केला आणि यावर वेगळ्या ऑफर्स देण्यात आल्याचेही सांगितले. संजय राऊत यांना याची कल्पना आहे का, असा टोलाही त्यांनी लगावला. “हम करे तो रासलीला, तुम करे तो कॅरेक्टर ढिला,” असे म्हणत त्यांनी राजकीय दुटप्पीपणावर टीका केली.
राजकीय आरोपाबरोबरच देशपांडेंनी मुंबईतील रस्ते आणि केबल प्रकल्पांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. शहरात सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण केल्यावर पुन्हा खोदली जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आणि चौकशीची मागणी केली. तसेच, बेस्टच्या आधीपासून असलेल्या केबल असतानाही टाटा पॉवरला परवानगी का देण्यात आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी दावा केला की, 220 केव्ही केबलसाठी परवानगी मिळाली, पण प्रत्यक्षात ऑप्टिकल फायबर केबल टाकल्या जात आहेत. एक परवानगी घेऊन चार प्रकारच्या केबल का टाकल्या जात आहेत, असा थेट सवालही त्यांनी केला. देशपांडेंच्या या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणात खळबळ माजली आहे आणि प्रशासनाला प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे.


