मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात यावे, अशी मागणी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाने पत्राद्वारे केली आहे.

कोरेगाव भीमा आयोगासमोर उद्धव ठाकरे किंवा त्यांचा प्रतिनिधी हजर राहिला नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अटक वाॅरंट जारी करण्याची मागणी करण्यात आली. त्यांनी याबाबतचा अर्जही आयोगाकडे दाखल केला आहे.
कोरेगाव भीमा दंगलीच्या संदर्भात शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्राची प्रत आयोगाकडून पवार यांच्याकडे मागण्यात आली होती. मात्र, ती प्रत आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी ती प्रत देण्यासाठी त्यांना नोटीस देण्यात आली होती. मात्र, ठाकरेंकडून या नोटीसीला उत्तर देण्यात आलेले नाही.
आयोगाने कायदेशीर नोटीस बजावूनही, उद्धव ठाकरे किंवा त्यांच्यावतीने कोणतेही प्रतिनिधी आयोगासमोर हजर राहिले नाहीत. आयोगाच्या नोटीसला या पद्धतीने बगल दिल्यामुळे, प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला. आयोगाच्या कार्यवाहीला सहकार्य न केल्याबद्दल आणि वारंवार नोटीस देऊनही हजर न राहिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तातडीने अटक वॉरंट जारी करण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज त्यांच्या वकिलांनी भीमा कोरेगाव आयोगाकडे सादर केला आहे.
मंगळवारी (ता.2) कोरेगाव भीमा आयोगापुढे सुनावणी झाली. या सुनावणी वेळी ठाकरेंच्या वतीने कोणतेही निवेदन अथवा कागदपत्र सादर करण्यात आली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे वकील अॅड किरण कदम यांनी आयोगाकडे ठाकरेंच्या विरोधात अटक वाॅरंट जारी करण्यासंदर्भात अर्ज केला. या अर्जावर भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने अद्याप कोणताही अंतिम निर्णय दिला नाही. पण प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाने अर्ज केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



