Home » राष्ट्रीय » भारत बनेल वैद्यकीय पर्यटन केंद्र; आरोग्यसेवेसाठी भरीव तरतुदी

भारत बनेल वैद्यकीय पर्यटन केंद्र; आरोग्यसेवेसाठी भरीव तरतुदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

आज (दि. १ फेब्रुवारी) सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये देशाच्या आरोग्यसेवेला भक्कम बळ देण्यावर केंद्र सरकारने विशेष भर दिला आहे. सामान्य नागरिकांना परवडणारी आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी, यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.

या अर्थसंकल्पात १७ प्रकारच्या कर्करोगावरील औषधे आणि सात दुर्मिळ आजारांवरील औषधे स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्करोगाच्या प्रमुख औषधांवरील मूलभूत सीमाशुल्क माफ करण्यात आल्यामुळे औषधांच्या किमतीत लक्षणीय घट होणार असून, रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच विशेष वैद्यकीय कारणांसाठी आयात केल्या जाणाऱ्या औषधांवरील सीमाशुल्क सूट योजनेत आणखी सात दुर्मिळ आजारांचा समावेश करण्यात आला आहे.

देशांतर्गत बायोफार्मा उत्पादन वाढवण्यासाठी आणि कर्करोग तसेच ऑटोइम्यून विकारांसारख्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी उपचार सुनिश्चित करण्यासाठी १०,००० कोटी रुपयांच्या निधीसह ‘बायोफार्मा शक्ती मिशन’ सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर औषधांच्या उत्पादनाला चालना दिली जाणार असून, आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. यासोबतच सार्वजनिक क्षेत्रातील आरोग्य शिक्षण संस्थांचे अपग्रेडेशन आणि विस्तार करण्यात येणार आहे.

आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी पुढील पाच वर्षांत १.५ लाख काळजीवाहकांना प्रशिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वृद्धांसाठी १.५ लाख नवीन काळजीवाहक तयार केले जाणार असून, दीर्घकालीन आरोग्यसेवा मजबूत करण्यास यामुळे मदत होणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयुर्वेदावर विशेष भर देत एम्सच्या धर्तीवर तीन नवीन आयुर्वेदिक रुग्णालये उभारण्याची घोषणा केली. याशिवाय पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येणार असून, पशुवैद्यकीय आरोग्य सेवेसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

भारताला वैद्यकीय पर्यटनाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी देशात पाच नवीन प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे स्थापन करण्यासाठी राज्यांना मदत केली जाणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालयांमधील आपत्कालीन व ट्रॉमा केअर सेंटर्सचा ५० टक्क्यांनी विस्तार केला जाणार असून, आपत्कालीन उपचार अधिक प्रभावी होतील. याशिवाय आयुष फार्मसी आणि औषध चाचणी प्रयोगशाळांचे अपग्रेडेशन करून त्यांना उच्च दर्जाचे प्रमाणन व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *