जळगाव : प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही जळगाव महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी पाच मुख्य नाले व १०२ उपनाल्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांतील उपनाल्यांची साफसफाई झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे दिसत नसल्याने, ही मोहीम केवळ कागदापुरती मर्यादित राहिली आहे का, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
महापालिकेने मे व जून महिन्यांत ठेकेदाराच्या माध्यमातून ही मोहीम राबवली होती. मात्र काही नाल्यांमध्ये साफसफाई झाल्याचे दिसले असले तरी त्यातील कचरा बाजूला ठेवला गेल्याने आरोग्यधोक्याचे संकट उभे राहिले आहे. अनेक ठिकाणी घाण अजूनही तशीच पडून आहे, याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले आहे.
२५ लाखांचा खर्च, पण स्वच्छता कुठे?
शहरातील नालेसफाईसाठी महानगरपालिकेने तब्बल २५ लाख रुपयांचा टेंडर एका ठेकेदाराला दिला आहे. प्रभाग १ ते ४ या विभागांत ही कामे दिली गेली आहेत. मात्र या रकमेच्या मोबदल्यात खरंच काम झाले का, याबाबत सखोल चौकशीची गरज आहे. याबाबत जळगाव मनपातील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी शहरातील नाल्याची साफसफाई झाल्याचे सांगितले आहे.
