पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक मुली आत्महत्या करते आणि आपण अजूनही हुंड्याविषयी बोलतोय, हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हुंडा प्रथेवर ताशेरे ओढले. तर महाराष्ट्र हुंडामुक्त व्हावा यासाठी समाजाच्या सर्व स्तरावर प्रयत्न होणं आवश्यक आहे. पुण्यात एका सुशिक्षित कुटुंबातील मुलीने केवळ हुंड्याच्या दबावामुळे आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लग्न समारंभात जाताना हुंडा घेतला किंवा दिला आहे का, याचा विचार करावा. जर हुंडा घेतला असेल तर अशा लग्नात सहभागी होऊ नये. लग्नाच्या रुखवतात गाडी दिसली, तर ती कोणी दिली, कोणाच्या नावावर आहे, हे विचारणे गरजेचे आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारले गेले तरच समाजात योग्य संदेश जाईल.सुळे यांनी जुलै महिन्यापासून पुढील एक वर्ष राज्यभर शाळा, कॉलेज आणि विविध संस्था यांच्यामार्फत हुंडाविरोधी जनजागृती मोहीम राबवण्याची घोषणा केली. या मोहिमेद्वारे तरुण-तरुणींसह पालकांमध्येही जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पुण्यात घडलेली आत्महत्येची घटना एका सुशिक्षित कुटुंबातली आहे. या घटनेबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, आजही काही कुटुंबांत सून माहेरी गेल्यावर गाडी, मोबाईल, इतर वस्तू घेऊन याव्यात यासाठी तिला दबाव टाकला जातो, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, मोबाईल हवा असेल तर स्वतःच्या पैशातून घ्या असे त्यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेतून महिलांना पैसे मिळाले, हे सकारात्मक आहे. मात्र त्यातून महिलांच्या आयुष्यात मोठा बदल झाला का, हे पाहणे गरजेचे आहे. लाडक्या बहीणींना 2100 रुपये कधी मिळतील, याबाबत निश्चितता नाही, असेही त्यांनी नमूद केले. जसे शेतकरी कर्जमाफीच्या वेळेस वेळ आली की देऊ असे सांगितले जाते, तसे इथेही घडते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारने महिलांना फक्त आर्थिक सहाय्य न देता, त्यांना व्यवसायासाठी संधी द्यायला हव्यात. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. इच्छाशक्ती आणि सामाजिक परिवर्तन ही संकल्पना फक्त निवडणुकीपुरती न राहता, ती कृतीत उतरली पाहिजे. पूर्वी सायबर क्राईम हा मुद्दा नव्हता, पण आज मोबाईलच्या वापरामुळे महिलांवरील गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत महिलांमध्ये जागरूकता वाढवणे गरजेचे आहे.



