अमळनेर : प्रतिनिधी
गलंगी ते चोपडा दरम्यान दोन जणांचा पाठलाग करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८ किलो १३० ग्रॅम वजनाच्या गांजसह २ लाख ६२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना २० रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींचे नावे उदयभान संजय पाटील (२१) रा. चांग्या निमजवळ अडावद ता. चोपडा, योगेश रामचंद्र महाजन (२१) रा. खालचा माळी वाडा अडावद ता. चोपडा अशी आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस रवींद्र पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. दोन इसम दुचाकीवर बसून गलंगी गावाकडून चोपडा शहराकडे अंमली पदार्थाची वाहतूक करीत आहेत, पोलिसांनी गलंगी गावात पाळत ठेवली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे व पोह. विलेश सोनवणे यांनीही रस्त्यावर पाळत ठेवली.आरोपींनी गलंगी गावात असल्याचे लक्षात येताच ते चोपडा शहराकडे भरधाव वेगाने त्यांच्याकडील दुचाकीने निघाले. त्यांचा पो. कॉ. विष्णू बिऱ्हाडे, रवींद्र पाटील, दीपक माळी हे पाठलाग करीत होते. परंतु त्यांचा वेग जास्त असल्याने पोलिस पथकाने ही माहीती पोउपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांना दिली.
वल्टे यांनी नीलेश सोनवणे यांच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने चोपडा शहरात नाकाबंदी लावली. आरोपींना प्रयत्न केला असता, दुचाकीवर मागे बसलेला आरोपी उडी पकडण्याचा मारून पळून गेला. जवळपास १५० ते २०० मीटर अंतर धावत पाठलाग करून पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीची दुचाकी तसेच ८.१३० कि. ग्रॅ. वजनाचा १ लाख २१ हजार ९५० रुपये किमतीचा गांजा तसेच ५१ हजार रुपये किमतीचे २ मोबाइल असा २ लाख ६२ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



