मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून वाद गेल्या अनेक दिवसापासून पेटलेला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आक्षेप घेत दावा ठोकला होता. तर नाशिक येथे भाजप नेते गिरीश महाजन यांना पालकमंत्रिपद दिले होते, तिथे देखील शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे यांनी दावा ठोकला होता.


पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच आता आता रायगडमध्ये 15 ऑगस्ट रोजी अदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर झाले आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार रायगडमध्ये अदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन हेच ध्वजारोहण करणार आहेत.

पालकमंत्री पदाची यादी वर्षाच्या सुरुवातीला 18 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची निवड काही तासातच रद्द करण्यात आली होती. रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, महायुतीतील तणावानंतर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती.



