छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आक्रमक भूमिका घेत असताना आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच थेट शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. 1994 मध्ये शरद पवारांनी मराठ्यांचं 16 टक्के आरक्षण हिसकावून ओबीसींना दिल्याने मराठा समाजाचं वाटोळं झाल्याचा घणाघाती आरोप जरांगे यांनी केला. याचवेळी, ओबीसी नेत्यांनीही पवारांचे उपकार मानले नसल्याची टीकाही त्यांनी केली.

मनोज जरांगे म्हणाले, “1994 मध्ये मराठ्यांचं हक्काचं 16 टक्के आरक्षण शरद पवारांनी ओबीसींना दिलं. यामुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं. पण ज्यांनी ओबीसींना आरक्षण दिलं, त्या पवारांचे उपकारही ओबीसी नेत्यांनी मानले नाहीत.” यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. मात्र, आता जरांगे यांनी थेट पवारांवर निशाणा साधत मराठा समाजाच्या नुकसानाचं खापर त्यांच्यावर फोडलं आहे.
दरम्यान, जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही गंभीर आरोप केले. भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यात गुप्त बैठक झाली असून, त्यात ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसकडे सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला गेल्याचा दावा जरांगे यांनी केला. “अजित पवारांनी मला इथं गुंतवून ठेवलंय, त्यामुळे ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसने घ्यावं, असं भुजबळांनी वडेट्टीवारांना सांगितलं,” असा खळबळजनक दावा जरांगे यांनी केला.



