भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील मुकेश भालेराव या सराईत गुंड असलेल्या तरूणाची क्रूर हत्या करून गाडून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाल्याने शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील टेक्निकल हायस्कूल मागे राहणाऱ्या मुकेश प्रकाश भालेराव (वय ३१) याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी आदींचा समावेश होता. यावर प्रशासनाने त्याला नाशिक येथे स्थानबध्द ही केले होते. यातून बाहेर आल्यानंतर मुकेश भालेराव हा भुसावळ येथेच वास्तव्याला होता. दरम्यान, सुमारे चार दिवसांपूर्वी मुकेश भालेराव याला घरून काही तरूण घेऊन गेले होते. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेऊन ही तो न मिळाल्याने आज सकाळी भालेराव याची पत्नी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. दरम्यान, आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मुकेश भालेराव याचा खून करून त्याचा मृतदेह तापी नदीच्या बाजूला असलेल्या भागात पुरून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुकेश भालेराव याचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले असून शहर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मुकेश भालेराव याच्या खुनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या कृत्यामागे पूर्व वैमनस्य असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुकेश भालेराव याची टोळी असून त्यांच्यावर तब्बल २६ गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याची हत्या ही टोळीयुध्दातून झाल्याची शक्यता ही व्यक्त करण्यात येत असून पोलीस तपासातून यातील सत्य समोर येणारच आहे. या खुनामुळे भुसावळात मध्यंतरी बंद झालेले टोळी युध्द पुन्हा सुरू झाले की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
