मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सर्वत्र आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे म्हंटले जात होते. अखेर त्यांनी अधिकृतरीत्या मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. खरंतर मी तेव्हाच थांबायला हवं होतं, मला वैयक्तिक अपेक्षा नव्हती, पदाची अपेक्षा नव्हती, फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा ही अपेक्षा पण वाटेल उपेक्षा आली, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी खदखद व्यक्त केली आहे. अखेर त्यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसे एकत्र येत असल्याची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे छत्रपती संभाजीनगर येथील प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी शनिवारी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे फेसबुक या समाजमाध्यमावर जाहिर केले.
याविषयी प्रकाश महाजन म्हणाले की, कुठंतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेल्या काही दिवसांपासून मनात येत होती. खरे म्हणजे यापूर्वीच थांबायला पाहिजे होते. कुठल्याही पक्षात राहिलो तरी निवडणुकीचे तिकिट मिळत नव्हते. केवळ हिंदुत्वाचा विचार जगला पाहिजे यासाठी आपण पक्षात होतो. खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्याच वेळी थांबायला पाहिजे होतं. खरं म्हणजे पहेलगामच्या वेळी मी थांबायला पाहिजे होतं. पण त्यावेळी मला असं वाटलं की कुठेतरी काहीतरी सुधारणा होईल.
व्यक्तिगत म्हणाल तर माझ्यापेक्षा अत्यंत कमी आहे. कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला निवडणुकीचा तिकीट मिळण्याची गरज नव्हती. कुठल्या पदाची गरज नव्हती. फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती. परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली.
लोकसभेच्या रणधुमाळीत कधी मला विचारण्यात आलं नाही, विधानसभेच्या वेळी प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं. जी जी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली ती मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. माझ्या कामाचं कौतुक नाही, मग माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाहीत त्याचे बोल मला लावण्यात आले. खरं म्हणजे मी फक्त अमित ठाकरे यांचा थोडा अपराधी आहे. मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता, अमितजी मी तुमच्यासोबत आणि तुमच्या मुलासोबत देखील काम करेल. पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली. मी दिलेला शब्द पाळू शकत नाही. अमितजी तुम्ही मला समजून घ्याल असं वाटतंय.
कधी कधी माणसाच्या क्षमतेप्रमाणे योग्य ते त्याला मिळत नाही. हा नशिबाचा मी एक भाग समजतो. असंख्य मनसैनिकांनी माझ्यावरती मनापासून प्रेम केलं. वेळोवेळी ते सर्वर्थाने माझ्यासाठी धावून आले. त्या सर्व मनसैनिकांचा मी कायमचा ऋणी राहील. पण मला असं वाटतं की आता आपण थांबलं पाहिजे,” असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.



