भंडारा : वृत्तसंस्था
करिअरची स्वप्ने डोळ्यांत साठवून महाराष्ट्रातून चेन्नई येथे नामांकित आयटी कंपनी Cognizant मध्ये इंटर्नशिपसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गटावर समुद्राने घाला घातला. शनिवारी (दि. २१) सुट्टीचा आनंद घेण्यासाठी समुद्रकिनारी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चेन्नईतील पाँडिचेरी रोडवरील गोल्डन बीच परिसरात घडली. महाराष्ट्रातील सुमारे १५ विद्यार्थ्यांचा गट येथे फिरण्यासाठी गेला होता. समुद्रकिनारी उसळणाऱ्या लाटांसोबत सेल्फी घेण्याच्या नादात असताना १० ते १५ फुटांची प्रचंड लाट उसळली आणि तिघांना खोल समुद्रात ओढून नेले. या दुर्घटनेत भंडारा जिल्ह्यातील मयुरी हरिश्चंद्र चौधरी (रा. वरठी, ता. मोहाडी, जि. भंडारा) हिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह शोधण्यात यश आले असून संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. जय पाटील हा विद्यार्थी अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. राज केदारी हा विद्यार्थी मात्र या संकटातून सुखरूप बचावला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि तटरक्षक दलाने तातडीने बचाव व शोधमोहीम सुरू केली. समुद्राच्या प्रचंड लाटेमुळे विद्यार्थ्यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. बेपत्ता जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नईत दाखल झाले असून, मयुरी चौधरी यांच्या कुटुंबीयांनी नागपूरहून चेन्नईकडे धाव घेतली आहे. भंडारा जिल्हा प्रशासनाने तामिळनाडू प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक समन्वय सुरू ठेवला आहे.
करिअर घडविण्याच्या उद्देशाने घरापासून दूर गेलेल्या तरुणांवर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. समुद्रकिनारी सेल्फी घेण्याच्या वाढत्या मोहामुळे घडणाऱ्या अपघातांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.


