मुंबई : वृत्तसंस्था
अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळाने आता अधिक तीव्रता धारण केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीसाठी दोन नंबरचे दूरस्थ धोक्याची सूचना सिग्नल सर्व बंदरांवर लावण्यात आले आहेत.

शुक्रवारी (दि. ३) रात्री ९ वाजता (2100 Hrs IST) हे चक्रीवादळ ईशान्य अरबी समुद्रावरून वायव्य दिशेने सरकले. ते २२.० अंश उत्तर अक्षांश आणि ६६.४ अंश पूर्व रेखांशावर केंद्रित झाले होते. गेल्या ६ तासांत त्याची गती ८ किमी प्रतितास होती. ते ठिकाण द्वारका (गुजरात) च्या पश्चिमेस सुमारे २८० किमी, पोरबंदरच्या पश्चिमेस ३२० किमी आणि कराची (पाकिस्तान) च्या दक्षिणेस सुमारे ३३० किमी दूर होते.
हे चक्रीवादळ सुरुवातीला वायव्य दिशेने आणि नंतर पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची दाट शक्यता आहे. ४ ऑक्टोबर २०२५ च्या सकाळी त्याची तीव्रता वाढून ते एका तीव्र चक्रीवादळात (Severe Cyclonic Storm) रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकत उत्तर आणि त्याला लागून असलेल्या मध्य अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागाकडे पोहोचण्याची शक्यता आहे. डहाणूपासून ते Marmugao (मार्मागोवा) पर्यंतच्या सर्व बंदरांवर दोन नंबरचे दूरस्थ धोक्याचे सूचना सिग्नल (DW-II) कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा तसेच किनारपट्टीवर आणि समुद्रात योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाचे पुढील बुलेटिन ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०५:३० वाजता (0530 Hrs IST) जारी केले जाईल. नागरिकांनी आणि प्रशासनाने हवामान विभागाच्या सूचनांचे गांभीर्याने पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



