सातारा : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील एका गावा विचित्र अपघात घडल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे. अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांचा हल्ला झाल्याचा हा प्रकार आहे. घडलेल्या घटनेत अनेक नागरिक जखमी झालेले आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावात हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. जिथे अंत्यविधीसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने गावात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात सुमारे ३० ते ३५ लोक मधमाशांच्या चाव्यांचे बळी ठरले असून त्यांना तातडीने वाईतील खासगी हॉस्पिटल तसेच पसरणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पसरणी गावात घडलेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. अंत्यविधीच्या कार्यक्रमादरम्यान अचानक आजूबाजूच्या झाडांवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांमधून मधमाशा बाहेर आल्या आणि त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर तुफान हल्ला चढवला. झालेला हल्ला इतका तीव्र होता की, काही क्षणांमध्येच अनेक लोक जखमी झाले आणि काहींची स्थिती चिंताजनक बनली.
अंत्यविधीसाठी झालेला मधमाशांचा हल्ला अनपेक्षित असल्यामुळे उपस्थित लोकांमध्ये मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही जण घटनास्थळावरून पटकन पळून गेले, तर काहींना इतके चावे बसले की ते जागेवरच कोसळले. यावेळी काही स्थानिकांनी तातडीने पोलिस आणि आरोग्य यंत्रणेला माहिती दिली.



