सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे मोठे बंधू आणि शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला.

महेश चिवटे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महेश चिवटे यांना तातडीने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप महेश चिवटे यांनी केला आहे.
दिग्विजय बागल हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार होते. तर रश्मी बागल कोलते या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. चिवटे यांनी केलेल्या या आरोपामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांमधील वाद यापूर्वीही समोर आला होता.
हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रणजीत माने हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, हल्लेखोर आणि त्यामागील नेमके कारण काय आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद विकोपाला गेला असून, संपूर्ण तपासानंतर सत्य समोर येईल.
सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. याचे कारण म्हणजे, आज सकाळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते, मात्र आज सकाळी महेश चिवटे शेतातून परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या घटनेमुळे सोलापूरमधील शिवसेना शिंदे गटात तणाव विकोपाला गेल्याचे दिसून येते. महेश चिवटे यांनी या हल्ल्यामागे रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे, दिग्विजय बागल यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची उमेदवारी घेऊन विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यांच्या प्रचारासाठी खुद्द एकनाथ शिंदे देखील आले होते. यामुळे जिल्हाप्रमुख महेश चिवटे आणि बागल यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी वाढत जाऊन त्याचे रूपांतर थेट हल्ल्यात झाले आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे; संपूर्ण तपासानंतर या प्रकरणातील सर्व गोष्टी समोर येतील.



