पुणे : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वाढला असून मंगळवारी 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भारत सरकारनेही पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेत सिंधू पाणी करार बंद करण्यासारखे अनेक मोठे निर्णय घेतले. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, सरकारने तेथील पर्यटकांना बाहेर काढलं. ही चूक केली. खरं तर त्यांना सपोर्ट द्यायला हवा होता, पर्यटकांच्या मनात भीती नव्हती. त्यांना सुरक्षा मिळणार की नाही हा प्रश्न होता. पाहिजे तर सरकारने पर्यटकांचा खर्च करायला हवा होता. हल्ला होवूनही पर्यटक आहेत आणि स्थानिक मदत करत आहेत. तर पर्यटकांना बाहेर काढलं नसतं त्यांना सुरक्षा दिली असती तर कळलं असतं, परिस्थिती कळाली असती की, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना म्हणाले की, झेलम , चिनाब पाणी करार स्थगित करण्याचा पाणी सांगितला जात आहे. नद्याचं पाणी भारतीय सरकार वापरणार कसं याचा खुलासा केला नाही. त्याची खोली वाढवणार आहोत किंवा पाणी कसे अडवणार हे सांगितलं नाही. वर्ड बँकेची गॅरंटी आहे, त्याचं परिणाम काय होणार आहे, हे केंद्र सरकारने सांगावं. सामान्य माणूस हे विचारात आहेत, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
तसेच इतकी हत्यार विकत घेतली आहेत, विमान घेतली त्याचा उपयोग काय? केंद्र सरकारला तुम्ही ऍक्शन घेणार आहात का? कागदोपत्री घोडे नाचवणं थांबवा. ठोस कारवाई तुम्ही करणार आहात का? आर्मी उत्तर द्यायला तयार आहे. ज्याची कमतरता आहे ती पॉलिटिकल विंगची आहे, राजकीय कमतरता आहे. निर्णय घ्यायला शासनाला लोकांचा पाठिंबा आहे. लोक शासनाच्या पाठीशी उभे राहतील, असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी म्हटलं.



