जळगाव : प्रतिनिधी
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाने रविवारी जळगाव शहरात तीव्र आंदोलन छेडले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.

रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता भारतीय जनता पक्षाच्या जुने वसंत स्मृती कार्यालयापासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेसह तिरडी उचलून शहरातून अंत्ययात्रा काढली. आंदोलनादरम्यान “शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही” अशा घोषणा देण्यात आल्या.
या अंत्ययात्रेत आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्यासह महेश चौधरी, राजू मामा, राहुल वाघ, नितीन इंगळे, राजेंद्र मराठे, आनंद सपकाळे, मनोज भांडारकर, मुकुंद मेटकर, चंदू महाले, अजित राणे, निलू आबा तायडे, विनोद मराठे, प्रकाश पंडित आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. तिरडीला प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खांदा दिला. टावर चौकात अंत्ययात्रा पोहोचल्यानंतर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक शोक व्यक्त करत घोषणाबाजी केली. यावेळी मंगलाताई बारी व महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध नोंदवला.
या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, युवा मोर्चा व महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


