मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई शहरातील शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटानं केला आहे. तमाम शिवसैनिकांसाठी मीनाताई ठाकरे या मासाहेब म्हणून ओळखल्या जात होत्या. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी त्या आईसमान होत्या. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण आहे.

दरम्यान, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. नेमकं काय घडलं याबाबत ते चौकशी करत आहेत. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. अज्ञात लोकांनी हे केल्याचं सांगण्यात येत आहे. हा प्रकरात काल रात्री घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, स्थानिक शिवसैनिकांना याबाबत माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी फोटो काढून पुतळ्याची स्वच्छता सुरू केली. दरम्यान, हा प्रकार समजल्यावर दिवाकर रावतेंच्या डोळ्यात पाणी आल्याचं देखील समजतंय.
शिवसैनिकांनी याबाबत वरिष्ठ भूमिका घेतील असं सांगितलं तसंच जे कोणी हे केलं आहे त्यांना सोडणार नाही अशी देखील आक्रमक भूमिका काही शिवसैनिकांनी घेतली. शिवसेनेपाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकल्याच्या घटनेची दखल घेतली आहे. उद्धव ठाकरे देखील मीनाताई ठाकरे घटनास्थळी येण्याची शक्यता आहे. शिवसैनिकांनी यावेळी पुतळ्याला २४ तास दिलेलं पोलीस संरक्षण का काढून घेण्यात आलं असा सवाल देखील केला. दरम्यान, अनिल देसाई यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याबाबत निर्माण झालेल्या वादावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘बाळासाहेब आणि माँ साहेब या आमच्या आदर्शस्थानी आहेत. त्यामुळं जर कुणी समाज कंटकानं काहीतरी आक्षेपार्ह केलं असेल त्याला गजाआड करण्याचं काम आमचं सरकार करेल, आम्ही देखील या घटनेचा निषेध करतो. ‘ दरम्यान, नवनाथ बन यांनी सेवा पंधरडव्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, आम्ही जनतेची सेवा करतो. तुम्ही मेवा खाता. आमचा सेवा पंधरवडा असतो. तुमचा मेवा पंधरवडा असतो.’ ते पुढे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे घरात बसण्यापलिकडे काहीच केलं नाही. नरेंद्र मोदी यांची युग पुरूष अशी नोंद इतिहासात झाली आहे. मोदीजी लोकनेते आहेत. उद्धव ठाकरे यांना लोकांनी नाकारलं आहे.



