Home » महाराष्ट्र » …तेव्हा त्याच दादांनी मला मुख्यमंत्री केले ; शरद पवारांची कबुली !

…तेव्हा त्याच दादांनी मला मुख्यमंत्री केले ; शरद पवारांची कबुली !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांची उपस्थिती होती. यावेळी शरद पवारांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे. वसंतदादा हे आमचे नेते होते, मात्र ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित होतो. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत होते. मात्र आम्हा तरुणांचा त्या एकत्रीकरणाला विरोध होता. त्यामुळे आम्ही वसंतदादांचे सरकार घालवायचे ठरवले आणि ते घालवलं. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो, अशी थेट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

शरद पवार म्हणाले की, , ज्या वसंतदादांचे सरकार मी पाडले, त्याच वसंतदादांनी नंतर भूतकाळ विसरून गांधी-नेहरूंच्या विचारांसाठी मला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. ही त्या काळच्या नेतृत्वाची मोठी मनोवृत्ती होती. त्यावेळी वसंतदादा, रामराव अदिक, शिवाजीराव निलंगेकर अशा अनेक नेत्यांची मुख्यमंत्रीपदासाठी नावं चर्चेत होती. मात्र वसंतदादांनी स्पष्ट सांगितलं की आता कुणाच्याही नावाची चर्चा नको, नेतृत्व शरद कडे द्यायचे.

शरद पवार म्हणाले की, काँग्रेस एकदा दुभंगली. आम्ही स्वर्णसिंग काँग्रेसमध्ये होतो. यशवंतराव चव्हाण साहेब देखील आमच्यासोबत होते. निवडणुकीनंतर कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. इंदिरा काँग्रेस आणि आम्हा स्वर्णसिंग काँग्रेसच्या जागा मिळून आम्ही एकत्र आलो आणि वसंतदादांना मुख्यमंत्री केलं. मात्र आमचा, विशेषतः तरुणांचा, इंदिरा काँग्रेसवर राग होता. वसंतदादांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत होतं, पण तरीही त्या सरकारविषयी आमच्यात अंतर होतं आणि सरकार पाडण्याचा निर्णय आम्ही घेतला.

पुढे शरद पवार म्हणाले की, वसंतदादा, यशवंतराव, अदिक, निलंगेकर यांच्यासारख्या नेत्यांनी महाराष्ट्रात नेतृत्वाची भक्कम फळी तयार केली. यामुळेच महाराष्ट्र देशात एक सक्षम राज्य म्हणून ओळखला गेला आणि टिकून राहिला. आजही जर देशाचा चेहरा बदलायचा असेल, तर गांधी-नेहरूंच्या विचारांची नव्यानं मांडणी झाली पाहिजे.

शरद पवार म्हणाले की, पूर्वी राजकारण मोठ्या मनाने केले जायचे. भूतकाळ विसरून एकत्र येण्याची तयारी होती. आज मात्र संसदच सत्ताधाऱ्यांकडून बंद पाडली जाते. ही लोकशाहीची घोर विटंबना आहे. ते चित्र बदलण्याची वेळ आली आहे, असंही पवार म्हणाले.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *