मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असतांना महायुती सरकारवर विरोधक टीका करत असतांना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी महायुती सरकारवर निशाणा साधताना केली आहे. एकेकाळी राज्यात अंडरवर्ल्डचे राज्य होते. त्याचा बऱ्यापैकी बीमोड झाला. पण आता त्यांची जागा खंडणीखोरांनी घेतली आहे. सध्या राज्यात बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खंडणीखोरांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामु्ळे त्यांचा पायबंद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना व्यक्तिशः लक्ष घालावे लागेल.

पृथ्वीराज चव्हाण येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, भारत सध्या धर्माच्या नावाने हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. केवळ महामार्ग बनवल्याने विकास होणार नाही. तर शिक्षण, आरोग्य, संशोधन या विषयांवर देश काय करतो ते महत्त्वाचे आहे. केंद्राने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने यासाठी पुढाकार घेतला होता. काँग्रेसची लढाई विचारांच्या आधारावर आहे. पण काही जण विकासाच्या नावाखाली निधी व त्यातून टक्केवारीसाठी पक्ष सोडत आहेत. पण आम्ही आमचा लढा लढत राहू. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखा तरुण चेहरा पक्षाने प्रदेशाध्यक्षपदी दिला आहे. देशातही काँग्रेस वेगळ्या विचाराने पुढे जात आहे. देशात नक्की बदल घडेल.
ते पुढे म्हणाले, एकेकाळी राज्यात अंडरवर्ल्डचे राज्य होते. त्याचा बऱ्यापैकी बीमोड झाला. पण आता त्यांचा ताबा खंडणीखोरांनी घेतला. त्यांना रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना व्यक्तिशः लक्ष घालावे लागले. त्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून तक्रारी थेट या विभागात येतील अशी व्यवस्था करावी लागेल. महाराष्ट्र कधीकाळी परकीय गुंतवणुकीत आघाडीवर होते. आज उद्योग महाराष्ट्रात येण्यास धजावत नाहीत. यामुळे आपले दरडोई उत्पन्न 11 व्या क्रमांकावर घसरले आहे. सद्यस्थितीत केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खंडणीखोरांचे साम्राज्य पसरले आहे. त्याला थेट राजाश्रय आहे. अनेक जिल्ह्यांत औद्योगिक वसाहती येत नाहीत. त्याला खंडणीखोरांचे असणारे रॅकेट हे जबाबदार आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.



