जळगाव : प्रतिनिधी
लग्न सोहळ्यावरून परतताना रिक्षातून दागिने चोरीला गेल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. रेल्वे स्थानकावरून रिक्षाने घरी जात असताना दोन अनोळखी महिलांनी पर्समधील सुमारे ९८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याचा प्रकार ६ डिसेंबर रोजी घडला.

सविस्तर वृत्त असे कि, प्रभावती चुडामण वडीलकर (वय ५९, रा. न्यू पार्वती काळे नगर) या नाशिक येथे नातेवाइकांच्या लग्न सोहळ्यासाठी गेल्या होत्या. ६ डिसेंबर रोजी त्या रेल्वेने जळगावला परतल्यानंतर रेल्वे स्थानकावरून रिक्षा क्रमांक एमएच-१९ सीडब्ल्यू-३७७१ने घरी निघाल्या. प्रवासादरम्यान काही अंतरावरून दोन महिला सहप्रवासी रिक्षात बसल्या व बसस्थानकाजवळ उतरल्या.
घरी पोहोचल्यानंतर वडीलकर यांनी पर्स तपासली असता त्यामधील ५५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व ४८ हजार रुपये किमतीची पेंडल असलेली पोत गायब असल्याचे आढळून आले. यानंतर रिक्षातील दोन महिलांनीच दागिने चोरल्याचा संशय बळावला. या प्रकरणी प्रभावती वडीलकर यांनी १३ डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अनोळखी दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.



