सांगली : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत,” अशा शब्दांत गोपीचंद पडळकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

सांगलीतील जतमध्ये एका कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “2019 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला बहुमत दिलं होतं. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली. हे वर्तन म्हणजे सूर्याजी पिसाळासारखं गद्दारपणच होतं अशी टीका केली आहे. तसेच “सध्या मातोश्रीवर कोणीही भेटायला जात नाही. उद्धव ठाकरेंकडे कोणीच फिरकत नाही. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. याच नैराश्यामुळे उद्धव ठाकरे कोणालाही काहीही बोलू लागले असल्याची टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘अनाजीपंत’ अशी उपमा देत टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर पडळकर यांनी हा प्रतिहल्ला चढवला आहे. जत येथे एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना पडळकरांनी ही आगपाखड केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या टीकेला आता उबाठा गट काय प्रत्युत्तर देते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.



